Thursday, March 1, 2012

२९ फेब्रुवरी.....

२९ फेब्रुवरी तारखेत नविन ते काय? लिप इयर आहे, ४ वर्षातून एकदाच येते आणि काही?

माहिती नाही.....

पण माझ्यासाठी मात्र ही एक स्पेशल आहे. अशाच एका २९ फेब्रुवरीला मी एका वेगळ्या प्रवासाला सुरवात केली होती. खरे तर या ग्रुप मधल्या बहुतेकानी हा मार्ग कधी न कधी चोखळला आहेच.

२९ फेब्रुवरी १९९२ चा दिवस अजूनही माझ्या पूर्ण स्मरणात आहे. पहाटे ४च्या सुमारस उठलो. रात्रीचा मुक्काम ३ मार्बल वर होता. पट पट आवरले, तो पर्यंत दादा पाटीलही आवरून तयार झाला होता. धावत पळत मुंबई सेन्ट्रल गाठले, "खरेतर मी तुझ्या बरोबर येणार होतो पण ते शक्य नाही तेव्हा तू एकटाच अहमदाबादला जा." इती दादा...स्टेशनवर (अहमदाबाद) बुकिंग खिडकी पाशी कुणी तरी कार्यकर्ता परिषदेची डायरी घेऊन उभा असेल, तो तुला कार्यालयात घेऊन जाईल आणि आज पासून तुझे कार्यक्षेत्र अहमदाबाद म्हणजे कर्णावती असेल..." पूर्व योजना, पूर्ण योजने प्रमाणे माझे आरक्षाण झाले नव्हते पण दादाने कुठून तरी एजंट कडून तिकीट मिळवले होते.बरोबर रु. २०० दादाने दिले ब्लॅक मनी....

५.४५ झाले गाडी हलली आणि माझा प्रवास सुरु झाला.सहप्रवासी बहुतेक गुजरातीच होते. त्यात एक मोठी कच्छी कुटुम्ब होते. दादर यायच्या आत त्यांनी डबे सोडले होते. कुटुंबातील महिला डब्यातील पदार्थ काढून सर्वांना वाटत होत्या. कानावर सारखे गुजरती संभाषण पडत होते. कधी थोडेसे समजत होते, कधी डोक्यावरून जात होते. आणि याच भाषेवर मला प्रभुत्व मिळवायचे होते. जे सह प्रवासी मला परके वाटत होते मला त्यांच्यातलाच एक बनायचे होते.गाडी वेगाने पळत होती आणि माझे विचारही. खरे तर माझ्या बरोबरीने १०-१२ जण पूर्णवेळ निघाले पण मी एकटाच महाराष्ट्रा बाहेर का? माझ्यात काही जादा गुण आहेत की काही कंमी आहे म्हणून मला गुजरतमधे पाठवले आहे....माझा निभाव लागेल ना? इत्यादी....

वापी, सुरत, बडोदा करत गाडी एकदाची अहमदाबाद्ला पोहोचली. दुपार उलटून गेली होती. उन्हाळा सुरु झाला होता. अहमदाबाद स्टेशनवर उतरलो. वातारणात एक प्रकारचा सुस्तपणा भरला होता. (अनेकदा स्टेशन, स्टॅन्डवर उत्साही वातवरण असते) बुकिंग खिडकी पाशी तिघेजण उभे होते. एकाच्या हातात परिषदेची डायरी. तो होता विजेन्द्र पांडे कर्णावती शाखा सहमंत्री, शहर उपाध्यक्ष म्रुगेशभाई शुक्ल, आणि प्रदेश सह्संगठनमंत्री अतुलभाई कोठारी. म्रुगेशभाईच्या व्हेस्पा १५० वर बसून परिषद कार्यालय गाठले. कांतीलालच्या गाडीवरचा चहा मागवला. येणारी काही वर्षे हाच कडक आणि मीठा चहा मला साथ देणार होता. संध्याकाळी रुद्रेशभाई व्यास (माझ्या आधिपासून विद्यार्थी विस्तारक म्हणून काम करणारा)आणि आरतीबेनची (माझ्या आधिपासून विद्यार्थी विस्तारक म्हणून काम करणारी) ओळख झाली. रात्री म्रुगेशभाई कडे माझे आणि अतुलभाईची भोजन व्यवस्था होती.

पहाटे लवकर उठल्याने आणि दिवसभर प्रवासाने काहीसा क्षीण आला होता. कार्यालयातल्या सतरंजीवर आडवा होऊन कधी झोपलो ते कळलेच नाही.

आज या गोष्टीला २० वर्षे झाली. पण अजूनही काल परवा घडल्या सारखी वाटते. सहज आठवले म्हणून शेअर केले.

No comments:

Post a Comment