दि.२७ जुलै २०११ रात्री १०.३० वा. बाहेर जाउन आलो आणि झोपण्या पूर्वी काही तरी वाचायचे म्हणून रुजुता दिवेकरचे पुस्तक ’ डोन्ट लूज युवर माईन्ड लूज युवर वेट’ समोर धरले. डाएट, वजन कमी करणे या विषयावरचे पुस्तक, वजन, जाडी कमी करण्यासाठी फ़ार अतिरेक करण्याची गरज नाही, कोणीही हे सहज करू शकतो असे काहीसे लेखिकेने लिहिले होते. मनात विचार आला, भाऊने हे पुस्तक वाचले पाहिजे.थोडासा व्यायाम आणि जरासे पथ्य जर तो पाळू शकला तर? असा विचार मनात घोळवत वाचत असतानाच फ़ोन वाजला. बहुदा १०.५० वाजले असावेत. यावेळी कुणाचा फ़ोन? विचार करत उचलला तर भाऊ बांबवडेकर समोरु बोलत होता, "प्रशांत भाऊ गेला!" योगायोग काय असतो, काही क्षणा पूर्वी मी ज्याच्या विषयी विचार करत होतो, त्यानेच या जगाचा निरोप घेतला होता.
"अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनि जाती परंतू त्यची गणती कोणी ठेविली असे?" या जगात किड्या-मकोड्या सारखे अनेकजण जन्मला येतात आणि मरतात, त्यांचा जीवन प्रवास हा जन्म - शिक्षण - नोकरी - विवाह - मुले/मुली - त्यांची शिक्षणे - लग्ने - नातवंडे या क्रमात कधीतरी म्रुत्यु या पेक्षा वेगळा असा नसतोच. भाऊ या चाकोरीत बसणारा कधीच नव्हता. तो एक मनस्वी होता.त्याच्या विषयी काय आणि कसे लिहावे, सुरवात कोठून करवी ते समजत नाही.
भाऊचा एक पैलू म्हणजे त्याचा जनसंग्रह. भाऊचे स्वत:चे मित्र भरपूर होते पण माझे मित्रही त्याचे मित्र होते. बाळसाहेब मंगेशकर, सुनिल शेंडे सारख्या दिग्गजा पासून त्याच मित्र संग्रह होता तो चैतन्य़ महाराज देगलूरकर.....असे अनेकजण. माझे पुण्यातले परिषदेचे मित्र हे त्याचे मित्र होऊन गेले होते. माणसाला लक्षात ठेवण्याची त्याची विषेशता होती. मी अहमदाबाद्ला असताना, एकदा आई आणि अलका तिकडे आल्या होत्या. पुण्यात त्यानां गाडीवर सोडायला माझा मित्र रवी शिंगणापूरकर आला होता. तो आणि भाऊ त्यावेळी पहिल्यांदा भेटले असावेत, पण तेव्हा पासून भाऊ रवीला कधीच विसरला नाही. माझे कोल्हापुरातले मित्रही त्याचे मित्र झाले होते. आणि पहिल्या भेटीतच तो त्यांना उम्या, विज्या म्हणायला लागला. नेहमी भेटल्यावर तो आवर्जून त्यांची चौकशी करायचा.
भाऊ आणि त्याचे खाद्यजीवन या वर न लिहिता हा लेख पुरा होउ शकत नाही."चवीने खाणार त्याला देव देणार" ही म्हण भाऊच्या बबतीत शब्दश: खरी होती. अनेकदा तो कोल्हपूरला यायचा, सायंकाळी आमचा परिपाठ कोल्हापुरच्या खाद्य संस्क्रुतीचा अभ्यास करण्याचा, रंकाळ्यावर जायचे. सर्व गाड्यांवरील पदार्थांचे परिक्षण करायचे, अंबाई टॅंक येथे गोविंदभाऊकडे मग कॉफ़ी पान करायचे आणि रात्री दही भात खायचा आणि झोपायचे.मी पुण्यात आल्यावर त्याने मला पुण्यतली खाद्यस्थानांची सफर घडवली, अप्पाची खिचडी-काकडी. रविवारी सकाळी स्पेशल संडे-पॅटीस, चितळ्यांकडील अंबा बर्फ़ी, मोतिचूर लाडू, बूर्ज्वाची एक्सप्रेसो कॉफ़ी यादी मारुतीच्या शेपटी सारखी वाढतच जाईल.एकदा असाच तो धारवडला सप्त्याला जाऊन परत पुण्यला चालला होता. माझेही पुण्यात काम असल्याने मी पण त्याच्या बरोबर निघलो होतो. संध्याकाळी आम्ही कोल्हापूर सोडले आणि भाऊला इडली खायची लहर आली. वाटेतल्या सर्व हॉटेल मधे शोध घेत व्हाया इसलामपूर आम्ही कराडला संगम हॉटेल पर्यंत पोहोचलो. संगम मधेही इडली काही मिळली नाही पण वेटर म्हणाला समोरच्या साईराज मधे कदचित मिळू शकेल, झाले आमची वरात साईराज मधे दाखल झाली. अप्पा- साईराजचा मालक खाशा-महेमानासाठी स्वत:हून हाजर झाला, भाऊच्या स्वभावा प्रमाणे त्याच्याशी दोस्ती झाली आणि त्याने इडली ऐवजी गरमा गरम चापती, लसणाची मस्त चटणी, भाजी म्हणत पूर्ण जेवण जेवायला लावले. ५ मिनिटात इडली खाउन निघयचे ठरवून गेलेलो आम्ही चांगले दीड तास थांबलो. आजही साईराजचा अप्पा माझा मित्र आहे.त्या नंतर अनेक वेळा मी तिथे जेवलो, नाश्ता केला पण निमित्त मात्र भाऊ होता.
साहित्य हा भाऊच्या व्यसंगाचा विषय होता. तसेही त्याचे शिक्षण मराठी विषयात झालेले होते. प्रचंड वाचन असे. एकदा मी असाच शांता शेळकेंचे गीत "तोच चंद्रमा नभात" गुणगुणत होतो, लगेचच त्याने त्या गीताची जन्म कथा सांगीतली. उत्तर रामचरितातला तो श्लोक ज्यात राम सीतेला म्हणतो पूर्वी सारखे दिवस राहिले नाहीत, बाबूजीं आणि ग.दि.मा. यांच्यात त्या काळात निर्माण झालेला तणाव आणि शांता शेळकेंनी तो श्लोक ऐकताच रचलेले गीत म्हणजेच "तोच चंद्रमा नभात". भाऊ स्वत: कवीही होता एकदा असेच सायंकाळी उशीरा रंकाळ्यात पाय सोडून आम्ही दोघे बसले होतो. पाठीमागे शालीनी पॅलेसचा कॅन्हास होता आणि त्याने मला स्वरचित कविता "दिन केवड्याची पात, सुरम्याची गर्द रात, काळ्या कुटील अभाळी कुणी ओलं गातं......." पु.ल., व.पु. बहुतेक सर्व नामंकीत साहित्तिकांचे साहित्य त्याने वाचले होते.
संगीत हा देखिल भाऊचा एक पैलू होता. त्याला संगीताचा कान होता. स्वत: तो पेटी वाजवत गाणी म्हणत असे. कधी कधी वर्षा सहलीला बहेर पडून तो पन्हाळा, महबळेश्वर येथे जात असे, तेव्हा हमखास त्याच्या बरोबर पेटी असायची. त्याच्या मोबाईलची कॉलर ट्युन हे त्याच्या संगीत प्रेमाचे उदाहरण असावे. पं. भीमसेन जोशींचे एक गाणे ही त्याची मोबाईलची कॉलर ट्युन होती.कॅसेट, विविध प्रकारच्या गाण्याच्या सीडीजचे त्याचे कलेक्शन खूप मोठे होते.
भाऊचा स्वत:चा संसार नव्हता पण तो इतरांच्या संसाराचा एक भाग नक्कीच होता. त्याच्या बहुतेक सर्व वहिन्याना पहिल्यांदा आल्या नंतर त्याने साडी किंवा तत्सम वस्तु देऊन त्यांचा मान केला आहे. सर्व भाचे, पुतण्या, पुतणे यांचे भाऊने घेतलेले फोटो त्याच्या संग्रही होते.सर्व वहिन्यांची त्याची खास दोस्ती होती. प्रत्येकीची स्वयंपाकाची विषेशता त्याला माहिती होती. कोल्हापुरात आला की आई कडून अवर्जून हळद, मिरचीचे लोंणचे, लाल मिरचीचा ठेचा इत्यदी हक्काने तो घेऊन जायचा.
गेली काही वर्षे तो मधुमेह, उच्च रक्तचापा सारख्या आजारने त्रस्त होता.भाऊचे भाऊपण संपत चालले होते. त्याचा जिंदादिली अटत चालली होती. मनाच्या वेगाने शरीर पळत नव्हते. बोलता बोलता त्याने अनेकाना "आता बस झाले, पूर्ण विरम द्यावा " अशी इच्छा व्यक्त केली होती.मला वाटते भाऊ खरोखरच स्म्रुती रूपाने आपल्यात राहिल. त्याला विसरणे शक्य नाही. भाऊ विषयी सांगता येण्य़ा सारखे खूप आहे. पण इथे विराम घेणे आवश्यक आहे, नाही तर कधीच हे संपणार नाही. आज त्याचा १० वा दिवस, माझ्या तर्फे हीच आदरांजली.
कोल्हापूर
दि. ५ .०८.२०११
३-४ महिन्या पूर्वी पुण्यात गेलो असताना भाऊचा मोबाइल्वर काढलेला फोटो